Sunday 13 August 2017

तुला न सांगितलेलं ......

कुणी इतकं कायमच प्रिय वाटेल आयुष्यभरासाठी असं वाटलं नव्हत कधी ,
पण तु भेटलीस त्या अश्याच एका वळणावर ,
त्या मळलेल्या वाटेवर तुझ्या पाऊलखुणा उमटल्या ,
आणि बहरली ती पाऊलवाट अगदी आजपर्यंत .

कसं ना समुद्र शेवटी नदीचीच वाट पहात असतो, मगच तो महासागर होतो ,
तुझ्या मुळेच तर सारं शक्य झालं मला मनासारखं करायला ,
तु प्रत्येक क्षणी माझ्या सोबतीला होतीस म्हणुनच तर मला पुढं जाता आल .

तेव्हा एकदा कसा निष्पर्ण जीर्ण वृक्षासारखा कोसळणारच होतो मी ,
पण तु कशी लतेसारखी बिलगली होतीस मला
आणि कसं घट्ट पकडून ठेवलं होत ,
मला नवीन पालवी फुटेपर्यंत .

माझ्या भकास आभाळात तुच तर चांदण्याची नक्षी भरली होतीस ,
माझ्या फुटक्याच शिंपल्यात तुझ्याच रूपात तर मला मोती भेटला होता,
आनंदाचे सारे रंग इंद्रधनु होऊन तुच तर मला दिले होते.

पण आता सरलेत ते दिवस ,
हातपाय थरथरतात ,
नजर अंधूक झालीय ,
तुझही तसंच झालय .
तरीही तु असतेस त्या भजनात ,
जपतेस माझ्यासाठी नित्य नेमाने माळ ,
असतेस नेहमी एखाद्या ग्रंथाच्या पानावर ,
मला बरं वाटावं म्हणून तुझ मन कायम त्या देव्हाऱ्यावर .

मीही माघत असतो तुझ्यासाठी देवाकडे बरेच काही ,
पण माझ्यासाठी तर तुच मीरा आणि तुच राधा ,
मग देवाकडे देवासाठीच काय माघाव ,

तो तर केव्हाच पावलाय मला तुझ्या रूपात .....

...............!!! ©समीर !!!..................

1 comment: